Monday, October 5, 2020

विदारकता

 एक निर्भया मागे पडली आणि हाथरसने पुन्हा डोळे उघडले, हैदराबाद मध्ये झालेली घटना ताजी असताना पुन्हा हृदयाला हेलकावे घालायला लावणारी घटना ही नक्कीच दुर्दैवी आणि घृणास्पद आहे. अखिल स्त्रीजाती ही मातृस्वरुप असून तीला आदर न दिल्यामुळे प्रत्यक्ष इंद्रालाही इंद्रपद सोडावे लागले होते, याचा काहीसा विसर भारतात दिसून येतोय. ज्या ठिकाणी नारीला परमेश्वर म्हणून पूजातात , प्रकृती आणि पुरूष अशा अविभाज्य गोष्टींबाबत बोलल जात, तेथिल हे दृष्य नक्कीच चिंताजनक आहे.


पण चिंतेची बाब मुळी ही वाटत नसून, आपल्या राजकीय फायद्यासाठी करत असलेल्या चांडाळकृतींची आहे. कारण याही स्थितीत आपली राजकीय पोळी भाजण्याच्या उद्देशाने बरेच जणांनी आपले हात सज्ज केले आहेत. पण या भारतामध्ये कृप, भीष्म यांनी जरी नारी अपमानात भाग घेतला नसेल, तरी ते शांत पहात बसले एखाद्या निर्जिवाप्रमाणे म्हणून त्याना पण या शासनाचा भाग व्हावा लागलेला. सध्या तीच आपली स्थिती आहे.


इतिहासात ज्याप्रमाणे देवगिरी निर्धास्तपणे आपल्या पूजा अर्चनेत गुंतलेला होता, ज्यावेळी खिल्जीने चितोडगड पादाक्रांत केला, तशीच आपली अवस्था आहे. आपण पूजा अर्चनेत नक्कीच नाही, तर आपण एक गलिच्छ राजाकारणाचा भाग बनून बसलोय. कोणतीही गोष्ट चूक अथवा बरोबर हे देखील आंम्हाला कोणी दुसरा सांगायला लागवा, एवढी आमची बुद्धी दास्यत्वाच्या अधिन केव्हा झाली हे कळले पण नाही. आज दिल्ली, हैदराबाद किंवा हाथरसची घटना ,परवा जर आपल्या जवळ घडली तर पुन्हा एकदा न्यायदेवतेच्या गाभा-यात दरवाजा ठोठवायला जायची वाट का बघावी? आणि किती वेळ बघावी? पुन्हा चितोडगडवर आलेला अल्लाउद्दीन महाराष्ट्रात कधी येतो याची वाट बघत बसावी  की सज्ज करावी आपली सेना, हा पेच पुन्हा देवगिरीच्या रामदेवसमोर पडवा हेच दुर्भाग्य... 


छत्रपती हे देखिल नावापुरते ठेवलेला समाज, त्यांच्या विचारांवर कधी चालेल हे समजणे मुळी कर्मकठीण आणि जर ते झाले नाही तर छत्रपती कदाचित देवत्त्वाला पोहचतील पण त्यांचे विचारमात्र रोज पायदळी तुडवले जातील. लहान वयात रामायण ,महाभारत सांगून स्त्रीबद्दलचा जो आदर जिजामातांनी शिवाबांच्या मनात निर्माण केला, तोच आदर या वाहिन्यांवरील मालिकांच्या विदारक दृष्टीकोनमुळे सध्याची आई देण्यास असमर्थ आहे, हेच दु:ख आहे. मुळात एखाद्या मुलीच्या फोटोखाली गलिच्छ टिप्पणी करण, हीच या गोष्टीत सुरुवात होणारी किड आहे.ज्या संस्कृतीची विशालमुळे जगात खोलवर गेलीत त्याला लागलेली ही वाळवी जर नष्ट केली नसेल तर खूप धोक्याच होऊन बसेल.


समाज शिक्षांनी सुधारण्यापेक्षा यथोचित शिक्षणाने व संस्कारानेच सुधारेल.

-विविवा

No comments:

Post a Comment